
मंडळी पीरियड्स अर्थात मासिक पाळी सुरू असताना मंदिरात जाणं योग्य आहे का ? पूजा करावी की टाळावी? हा प्रश्न आजही अनेक घरांमध्ये चर्चेचा विषय आहे. यावर प्रसिद्ध कथाकार जया किशोरी यांनी दिलेलं उत्तर सध्या खूप चर्चेत आहे.
खरेतर, पीरियड्सबाबत अनेक पारंपरिक समजुती आजही समाजात प्रचलित आहेत. अनेक ठिकाणी महिलांना मंदिरात जाणे, पूजा करणे किंवा काही धार्मिक कार्यांपासून दूर राहण्यास सांगितले जाते. या विषयावर बोलताना जया किशोरी म्हणतात की, पूर्वी अशा नियमांमागे महिलांच्या आरोग्याची आणि विश्रांतीची काळजी हा मुख्य उद्देश होता. त्या काळी स्वच्छतेच्या सुविधा मर्यादित होत्या. त्यामुळे महिलांना आराम मिळावा म्हणून काही बंधने ठेवली गेली होती.
मात्र, कालांतराने या गोष्टींचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि त्यांचा संबंध अपवित्रतेशी जोडला गेला. जया किशोरी यांच्या मते, पीरियड्स ही एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे आणि तिला अपवित्र मानणे योग्य नाही. दुसरीकडे, प्रेमानंद महाराज शास्त्रांतील काही नियमांचा उल्लेख करत सांगतात की या काळात पूजा-अर्चना टाळावी, मात्र नामस्मरण आणि भगवंताचे चिंतन करता येते.
शेवटी, हा विषय श्रद्धा, परंपरा आणि वैयक्तिक विश्वासाशी संबंधित आहे. प्रत्येकाने आपल्या श्रद्धेनुसार आणि समजुतीनुसार निर्णय घ्यावा.





