
ग्रामीण भागात आजही साप चावल्यावर अनेक लोक रुग्णाला डॉक्टरांकडे न नेता मांत्रिक, भोंदूबाबा किंवा झाडफुंक करणाऱ्यांकडे घेऊन जातात. आणि रुग्ण वाचला की लोक म्हणतात “मंत्रामुळे विष उतरलं!” पण खरं विज्ञान काय सांगतं माहिती आहे का?
नाही ना, चला मग जाणून घेऊयात. मंडळी, तज्ज्ञ सांगतात की, विषारी साप प्रत्येक वेळी चावताना विष सोडतातच असं नाही. काही वेळा ते फक्त घाबरवण्यासाठी चावतात. यालाच “ड्राय बाइट” म्हटलं जातं. म्हणजे सापाचे दात लागतात, पण शरीरात विष जात नाही. त्यामुळे व्यक्ती गंभीर आजारी पडत नाही आणि काही वेळात सामान्य होते.
याच गोष्टीचा फायदा काही भोंदू लोक घेतात आणि झाडफुंकीमुळे जीव वाचल्याचा दावा करतात. पण प्रत्यक्षात सापाने विषच सोडलेलं नसतं. म्हणून साप चावल्यास काय कराल ?
तर, रुग्णाला शांत ठेवा, त्याला धावपळ करू देऊ नका, कोणतेही घरगुती उपाय टाळा आणि सर्वात महत्वाचे त्वरित जवळच्या रुग्णालयात जा.लक्षात ठेवा, सर्पदंशावर एकमेव योग्य उपचार म्हणजे डॉक्टर आणि अँटी-स्नेक व्हेनम !





