
अहिल्यानगरसह राज्यभरात वाढत्या उष्णतेचा फटका आता थेट शेतकऱ्यांच्या खिशावर होऊ लागलाय.. जनावरे दूध देईनात आणि कोंबड्या अंडी देईनात त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय.
मंडळी, यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने अनेक ठिकाणी चाळीशी पार केलीये या तीव्र उष्णतेमुळे गायी-म्हशींच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. जनावरांची भूक कमी होत आहे आणि त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी दूध उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. यात भर म्हणजे पशुखाद्याचे वाढते दर, हिरव्या चाऱ्याची टंचाई आणि पाण्याचा प्रश्न त्यामुळे दुग्ध व्यवसाय सांभाळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. जनावरांना थंडावा देण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.
दुसरीकडे कुक्कुटपालन व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. प्रचंड उकाड्यामुळे कोंबड्यांचे खाद्य सेवन कमी झाले आहे आणि त्याचा थेट परिणाम अंड्यांच्या उत्पादनावर झाला आहे. काही ठिकाणी कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढल्याचे समोर आले आहे.
मंडळी, शेतीसोबत दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन हे शेतकऱ्यांचे मुख्य आधारस्तंभ मानले जातात. पण आता हवामान बदलामुळे या पूरक व्यवसायांनाही फटका बसत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत.





