
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मंडळी, राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यासाठी आता महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
सहकार विभागाने जिल्हा सहकारी बँकांकडून शेतकऱ्यांची सविस्तर माहिती गोळा केली आहे आणि ती सरकारकडे सादर करण्यात आली आहे. ही माहिती साधी नाही, तब्बल 54 वेगवेगळ्या मुद्द्यांवर शेतकऱ्यांची माहिती मागवण्यात आली होती.
यात कर्जाची रक्कम, परतफेड, जमीन, खाते, आधार, पिकाची माहिती अशा सगळ्या बाबींचा समावेश आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कर्जमाफीबाबतचा अंतिम निर्णय मे महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळ बैठकीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला, तर इथे जवळपास 1 लाख 84 हजार थकबाकीदार शेतकरी आहेत, तर 3 लाख 15 हजार नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत. म्हणजेच एकूण जवळपास 5 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होऊ शकतो.
थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे, तर जे शेतकरी नियमित कर्जफेड करत आहेत, त्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना आहे. मात्र अजूनही अंतिम निकष आणि पात्रता निश्चित होणे बाकी आहे. ते ठरल्यानंतरच प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.





