
अहिल्यानगर जिल्ह्याने राज्याच्या राजकारणात नवा इतिहास रचला आहे. विधानसभेतील 12 आणि विधान परिषदेवरील 7 असे मिळून तब्बल 19 आमदार देणारा अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक आमदार असलेला जिल्हा ठरला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर जिल्ह्याची राजकीय ताकद आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सहा तालुके सध्या सर्वाधिक पॉवरफुल मानले जात आहेत.
संगमनेरचे अमोल खताळ आणि सत्यजित तांबे, श्रीगोंद्याचे विक्रमसिंह पाचपुते आणि अमित गोरखे, पाथर्डीचे मोनिका राजळे आणि शिवाजीराव गर्जे, राहुरीचे अक्षय कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे कोपरगावचे आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे, हे दोन-दोन आमदार असलेले तालुके आहेत. पण सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे कर्जत-जामखेडने!
कारण या एकाच तालुक्याचे प्रा. राम शिंदे, रोहित पवार आणि सुनील कर्जतकर असे तब्बल तीन आमदार आहेत. राजकारणात अहिल्यानगरची ताकद वाढत असताना आता या 19 आमदारांकडून विकासाची गती किती वाढते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





